Wednesday, July 6, 2011

न पूछ दिल की हकीकत मगर ये कहते है

न पूछ दिल की हकीकत मगर ये कहते है

’झीमराठी’ वाहिनीवर ’पिंजरा’ या मालिकेचा १०० वा भाग झाला. प्रसारित त्यामधे काठापदराची साडी, डोक्यावर पदर, सारा गाव ज्यांना देवता मानतो अशा आक्का जेव्हा ’मी कुणाचाही खून केलेला नाही.’ हे विधान करतात तेव्हा ते वाक्य ऐकल्यावर कुणाचीही प्रतिक्रिया ’खर की काय? आणि केव्हापासून?! अशीच होते. त्यामागची कारणेही तशीच आहेत! ’शांती’ आणि’ ’अवंतिके’पासून आठवून पहा काय केले तुम्ही! सुंदर चेहरा असणारी ही मुलगी पडद्यावर खोटे बोलते, कपटी आहे, पाताळयंत्री आहे हे आम्हाला माहिती आहे.

आक्का, नजरेतला विखार, आवाजातली जरब, छ्दमी हसू , कुटील कारस्थान अशी हत्यार चालवत तुम्ही किती जणांना घायाळ केले याचा हिशोब ठेवायला ह्वाच ! दोष तुमचा नाही , जितका जीव ओतून आणि सहजतेने तुम्ही भूमिकेत शिरता ती क्षमताच याला कारणीभूत आहे. !

स्टार, सोनी, झी यातल्या हिंदी मालिका(शांती, सॆटरडे सस्पेन्स, ९ मलबार हिल, जाने कहा मेरा जिगर गया जी,सिंदूर, संगम, कर्म, फिल्म , ऐसे ना करो विदा, संभव असंभव)आणि त्यातला तुमचा वावर बघितला की तुम्ही मराठी आहात याचाच विचार काहींना पडला तर नवल काय? पण गंमत अशी आहे की जे मराठी नाहीत, जे महाराष्ट्राबाहेर आहेत, जे हिंदी मालिकांचे चाहते आहेत त्यांना तुमचे नाव तर माहितीच आहे पण तुमचे हिंदी मालिकांत असणेही त्यांनी गृहित धरले आहे. दशकाहून अधिक काळ तुम्ही विविध भूमिका समर्थपणे केल्या ,अनेकदा नेहमीचा आवाज, उच्चार, वेशभूषा असे सर्व बेअरींग बदलून स्वत:ची वेगळी आणि नवी ओळख निर्माण केली.



आतापर्यंत बहुतेकांना मी कोणाबद्दल बोलते आहे ते लक्षात आले असेल. आणखी काही क्लू हवा असेल तर अमिताभ बच्चनसमोर जखमी चेहरा घेऊन येणारी ’ऐतबार” मधली वेश्या किंवा एका सत्य कथेवर आधारित असलेल्या गेल्या वर्षीच्या ’अंतरव्दंद्व’ चित्रपटामधली मुलीची आई आठवा. उंचपु-या आणि घारे डोळे असणा-या ,मराठी हिंदी टेलेव्हिजनवर गेली दहा पंधरा वर्षे दिसतात अशा खर तर एक दोनच नट्या आहेत. हे सर्व चेहरे डोळ्यासमोर येताच प्रतिक्रिया एकच असेल- ओह! ती सुमुखी पेंडसे! पण सुमुखी पेंडसे हिची केवळ हीच एक ओळख म्हणजे तिच्यावर अन्याय आहे.

’या सुखांनो या” आणि ’माझिया प्रियाला प्रीत कळेना” मधे ब-याच काळानंतर हा चेहरा मराठी टेलेव्हीजनवर दिसला. ’सरीवर सरी’ या मराठी चित्रपटातला सिनियर मॊडेलचा रोलही डोळ्यासमोर आला. पिंजरा मालिकेत ’’आक्का” या मह्त्त्वाच्या भूमिकेत यावर्षी तोच चेहरा पाहून हे सगळ्या सुट्या, विखुरलेल्या, चित्रांचा कोलाज एकदम पूर्ण झाला. जे मनात आहे ते व्यक्त करायला केल पाहिजे अशी बोच लागली.

it's high time that we recognize your name, your contribution , your dedication towards performing arts and tell you how much we love you!



’इंद्राचे आसन आणि नारदाची शेंडी” या बालनाट्यात सुमुखीने इंद्राणीची भूमिका केली होती. तिथूनच तिचा रंगमंचावरचा प्रवास सुरु झाला. राजीव नाईक यांनी लिहिलेल्या ’आपसातल्या गोष्टी” या नाटकाचे दिग्दर्शन रेणुका शहाणे हिने केले होते. त्यात सुमुखीबरोबर किशोर कदम आणि सचिन खेडेकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ऐन वसंतात अर्ध्या रात्री, ऑथेल्लो यानंतर अनेक वर्षांनी सुमुखी रंगमंचावर आली ’स्थळ स्नेहमंदिर’ या नाटकात! वृद्धापकाळामुळे निर्माण होणा-या समस्या हा आज सर्व जगातच महत्त्वाचा विषय आहे. आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमुळे या समस्येला वेगळे कंगोरे प्राप्त झाले आहेत. या सर्वांचा उहापोह अभिराम भडकमकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकाने केला . भरजरी साडी, ज्वेलरी, मेकअप, हातात वाईनचा ग्लास, मॊडर्न आऊटफिट आणि हिंदी भाषा हे आपल्या सर्वांना जास्त परिचित असलेले सुमुखीचे रूप या भूमिकेत नाही. सुमुखी त्या नाटकात तितक्यात सहजतेने आणि आत्मविश्वासाने रंगमंचावर वावरली . ही भूमिका पाहिली तर सुमुखी असे वेगळे कामही करू शकते? किंवा मग ती इतर भूमिका का करते ? हे प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. याच भूमिकेकरता सुमुखीला २००८ सालचा सहाय्यक अभिनेत्री म्हणून झी गौरव पुरस्कार मिळाला.



सुमुखी आर्किटेक्ट आहे, तिने सोशॊलोजी मधे एम ए केले आहे. तिला वाचनाची आवड आहे, ती उत्तम जर्मन बोलते. मुंबईटाईम्समधे खास तरूणाईकरता ’हॆलो’ नावाचा स्तंभ सुमुखीने चालवला, ईटिव्ही करता ’आपलच घर’ चे लेखन आणि दिग्दर्शनही तिने केले . मालिका आणि सिनेमात ’स्टेरियोटाइप’ रोल सुमुखीला मिळाले पण ”नो प्रोब्लेम” नावाचा रात्री दहाला लागणारा एक ’ऎड्ल्ट कॊमेडी शो’ आठवून पहा. हे चाकोरीबाहरचे कामही तिने तेवढ्याच आत्मविश्वासाने केले. ’शांती” मालिकेमधली ’आयेशा’ ही सुमुखीची सर्वाधिक आवडती व्यक्तिरेखा आहे,तिच्यामुळेच सुमुखीची टेलेव्हिजन क्षेत्रातली कारकीर्द सुरुवात झाली. एवढेच नाही तर खलनायिकेचे काम करणेही तेवढेच आव्हानात्मक असते, त्यात वेगळी गंमत असते हे कळले असे सुमुखी म्हणते.



’एका रात्रीत मिळणारे स्टारडम अनेकांना दिसते, हवे असते. पण ते कायम टिकत नाही हे कळायला वेळ लागतो. या क्षेत्रात अनेक तरूण, नवे चेहरे येतात आणि जातात असे दिसते. जी मंडळी त्यांच्या कामाकडे लक्ष देतात, काही वर्षे टिकतात, मेहनत करतात, आवश्यक तसे स्वत:ला बदलतात तेच इथे यशस्वी होतात ’ असे सुमुखी म्हणते. ’नव्या येणा-या प्रत्येकाबरोबर काम करतांना, उत्साह वाढतो आणि सध्याच्या काळात लोकांचा, तरूण पिढीचा दृष्टीकोन कसा आहे , त्यांचे विचार काय आहेत हे समजत’ असे तिचे मत आहे.

’पिंजरा’ मधली आक्कांची भूमिका इतर भूमिकांपेक्षा वेगळी तर आहेच आणि आव्हानात्मकही आहे म्ह्णूनच ती सुमुखीला आवडते. शांती, अवंतिकामधे सुरुवातीपासून तिला बघणा-या रसिकांनाही अक्कांची भूमिका बेहद्द आवडली आहे. ही भूमिका सुमुखीला आणखी नामांकने आणि पुरस्कार मिळवून देईल यात शंका नाही.

रसिका

"’व्हाईट लिली नाईट रायडर’ पुन्हा सुरु करते आहे!" रसिकाच्या स्वरातूनच तिला किती आनंद झाला आहे ते कळत होतं. या नाटकाची संकल्पना कशी सुचली हे तिनं अनेकदा सांगितल आहे. संवादाची अनेक साधनं असतांना मनमोकळा, प्रामाणिक संवाद, जिव्हाळा, नातेसंबंधातले बदल या गोष्टी कशा आणि किती झपाट्यानं बदलत आहेत हे तिला समाजात वावरतांना पुन्हा पुन्हा जाणवतं यावर आमच बोलण झाल.



एखाद्या गोष्टीची जाणीव होण, त्याच विश्लेषण आणि त्यावर आपल अस स्पष्ट मत मांडण ही रसिकाची खासियत. आम्ही जेव्हाही भेटतो तेव्हा आपल्या आयुष्याविषयी तिच्या कल्पना किती स्पष्ट आहेत, आजूबाजूला घडणा-या गोष्टींची तिला किती सखोल जाण आहे हे कळायला फार वेळ लागत नाही.

अमूक केल की तमूक मिळेल आणि मग जीवनात आपण यशस्वी झालो या तथाकथित वळणात वाढलेल्या प्रत्येकाला पावलोपावली ठेच लागावी असाच तिचा मार्ग. संकुचित मानसिकतेमधून बाहेर पडायच असेल तर मोठी स्वप्ने, त्यावर विश्वास आणि त्याकरता लागणारे प्रयत्न आणि तेही वेगळ्या क्षेत्रात हे सर्व माझ्या कल्पनेबाहेरचे... सर्वसाधारण नोकरदार वर्गाने घेतलेला रुढ मार्ग ज्यांना मान्य नसतो, असे अनेक असतात; पण त्याविरुद्ध जायचे बळ ज्यांच्यात नसते त्यापैकी एक मी. ज्यांना वेगळी स्वप्न खुणावतात आणि जे ती पूर्ण करण्याकरता आयुष्य पणाला लावतात अशांपैकी रसिका एक. गिरीश दादा आणि ती एकत्र आले म्हणून माझी तिची गाठभेट झाली हा एक निव्वळ योगायोग. अन्यथा माझी तिची भेट झाली असती असं वाटत नाही. नाटक सिनेमाक्षेत्राबद्दल मला फार प्रेम नाही, शिवाय अगदी आवडता कलाकार दिसला की त्याच्याबरोबर फोटो काढून घ्यावा अशी इच्छा सुद्धा नसते. ते क्षेत्र, तिथली स्पर्धा, कलाकारांचे मनस्वी वागणे इत्यादी विषयी सर्वसामान्यांच्या मनात जे काही समज-गैरसमज, कुतूहल असेल तेवढच मलाही होत, आहे. तिच्या भेटीमुळे, परखड आणि मनमोकळ बोलण्यामुळे डोळ्यावर बांधलेली झापडं दूर व्हायला नक्कीच मदत झाली. ती तर फक्त वरवरच, तेवढ्यापुरतं बोलती तर...? पण ते तिच्या स्वभावातच नाही.

माझ्या आखून घेतलेल्या चाकोरीबद्ध आयुष्यात म्हटल तर सुरक्षित पण थोडे अनिश्चित वाटावज अशा एका टप्प्यावर मी होते आणि त्यावेळी ती स्वप्नाचा पाठपुरावा करतांना किती वेगवेगळया अवघड परीक्षा देत होती याची मला फक्त कल्पनाच होती. मला हव असलेल कस मिळाल नाही म्हणून माझी कुरकूर सुरू असे आणि तिच्या तोंडून मात्र एकही निराशाजनक वाक्य, खंत नसते. अनेकदा वाटायचं हा इतका काटेरी मार्ग हा निवडला आहे दोघांनी? उपजीवीकेचे इतर अनेक सोपे सहजसाध्य मार्ग असतांना हा अट्टाहास कशाला? प्रश्न फक्त पोटापुरत मिळवण्याचा नव्ह्ताच हे मला कळत नव्हतं असं नाही पण वळत नव्हतं हे मात्र खरं.

इंजिनियरींगनंतर पुण्याहून मी मुंबईला शिकायला गेले. घर सोडून मी पहिल्यांदा बाहेर पडणार होते. तिच्याबरोबर केलेला पुणे-मुंबई प्रवास, गप्पा कदाचित रसिका विसरली असेल; कारण त्यात ती काही वेगळं करत होती असं नसावंच. नातेवाईक असले तरी तेव्हा माझ्याजवळ असणारी, मला आपला वेळ देणारी आणि परिचित असणारी पहिली व्यक्ती रसिकाच. त्यावेळी तिच्याशी बोलतांना जगण्याकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन किती समंजस आणि प्रगल्भ होता याची कल्पना मला आली. किंबहुना नात्याच्या बंधनापलिकडे दोन व्यक्ती म्हणून आम्ही बोललो असू ते तेव्हाच.

एक डिग्री, आणखी एक डिग्री, एक नोकरी आणखी मोठी नोकरी हे आपल्याला हवं आहे का? हेच आपलं ध्येय आहे का? हे प्रश्न पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत राहिले. त्याची मला पटतील अशी समाधानकारक उत्तरे शोधून मी एका रीतीनं आयुष्याचा स्वीकार केला. पण ते सर्व करत असतांना मनाला आतून एक घोर लागला होता. तो म्हणजे रसिका जर या जीवघेणी स्पर्धा असणा-या क्षेत्रात माणुसकी कायम ठेऊ शकते ती माणुसकी आपल्याला तथाकथित यशस्वी आणि सोपा मार्ग निवडून तरी शिल्लक ठेवता येईल का?



एका तपाहून अधिक काळात आम्ही दोघी आमच्या वाटेवर चालत राहिलो. ’प्रपंच ’,”घडलय बिघडलय’ याशिवाय काही मालिका, चित्रपट यात तिच काम सुरु होत. तिन तिच स्वप्न पूर्ण केल, ते करत असतांना एकाहून एक अवघड प्रसंगाना तोंड दिल. एक अभिनेत्री म्हणून पदड्यावर रसिकाला पाहण जेवढ आनंदायी त्याहून जास्त आणि जिवंत अनुभव म्हणजे तिच्याशी झालेल्या मोजक्या प्रत्यक्ष भेटी. जेवढ मन लावून तिने प्रत्येक भूमिका केली तसंच तेवढंच जिव्हाळ्याचं तिचं बोलणं. नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमात ’आता खेळा नाचा’ हा मुलांकरता असलेला गाण्यांचा कार्यक्रम तिन केला. रसिकाने त्यातले एक गाणे म्हणून दाखवल्यावर माझ्या मुलीच्या चेह-यावरचा आनंद काही आगळाच होता.

’खुपते तिथे गुप्ते’ मधे रसिका म्हणाली ’की गिरीशच्या घरी जातांना एक सून, एक वहिनी असाही रोल म्हणून करून पाहू जमतो का? गंमतीचा भाग वेगळा, रोल म्हणून जरी केले तरी मी ते मनापासून केले.’’

प्रत्येक घरात स्त्रीला असे रोल करावे लागतात आणि अनेकदा मनाविरुद्ध .. त्यांचे कार्यक्षेत्र अभिनय नाही म्हणून माणसाच सगळ वागण खर असतं असं कुठे, हा माझ्या मनात त्याचवेळी उमटलेला प्रश्न.अभिनेत्री म्हणून कधी खरखुर जगण्याचा प्रयत्न केला, अभिनय केला नाही तरी हा सर्व अभिनयच असावा असा पूर्वग्रह सुद्धा रसिकासारख्यांच्याबाबत असू शकतो ना?

पण रसिकाचे वागणे या सर्वांपलिकडच आहे. माणुसकीच्या खूप जवळच आहे हाच अनुभव अनेकांना येतो.

तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास, उत्साह आणि सकारात्मकता तिला मिळालेल्या यशाबरोबर वाढत रहिली. तिच ’स्टार’ असण कधी आम्हाला तिच्या वागण्यातून जाणवत नाही. ती तस जाणवू देत नसली तरी त्यान ती स्टार आहे हे सत्य बदलत नाही! ’बिल्लू बार्बर’मधे तिचे काम बघून शाहरूख खानला भेटायच असेल तर रसिकामामीच ती भेट घडवून आणू शकते हे माझ्या मुलांना वाटल यात काही नवल नाही.

बिनधास्त, मनमोकळ बोलणारी रसिका ’खुपते तिथे गुप्ते’ मधे दिसली आणि पुन्हा सगळ्या आठवणी जिवंत झाल्या. स्पष्ट विचार, तशीच स्पष्ट मांडणी आणि तेवढ्याच समर्थपणे आपले प्रवाहाविरुद्ध असणारे विचार मांडण्याची तिची तीच ताकद पुन्हा जाणवली. फोनवर ती बोलत होती, जिव्हाळ्याने. मी शिकागोचे अधिवेशन, माझ्या कविताबिविता यावर बोलत राहिले. या कवितांसाठी एकटीने एकदा भारतवारी करावी, मुलांना अमेरिकेत ठेऊन, असा महत्त्वाकांक्षी बेत मी तिला सांगितला. त्यावर तिने तिच्या स्वभावानुसार उत्तर दिले. त्यावर दोघी मनापासून हसलो. ती एकदम म्हणाली, ’आई ती आईच असते ना.. मुलांना आई हवी असते.." तिच्या जागी दुसरीकुणी असती तर कदाचित "काय हा कोणत्या नाटकातला संवाद आहे" असे मी तितकेच पटकन विचारले असते. पण तिला विचारणार नाही. कारण अर्थातच तिचा उत्साह आणि सकारात्मक दृष्टीकोनाचा अखंड वाहता झरा.

तो झरा इतकी वर्षे अनेकांमध्ये उत्साह वाटून देखील झुळझुळता आहे, तो तसाच राहावा हेच मला अगदी मनापासून वाटत.

Friday, August 13, 2010

नको तेव्हा नको तिथे

नको तेव्हा नको तिथे
शाळेतले शिक्षक गेले, एखाद्या नेत्याची हत्या झाली की शाळेला सुटी मिळते.. ही आनंदाची घटना नाहीच पण तेव्हा सुटी मिळाली म्हणून काही मुलांच्या ओठावर हसू असते ! कॊलेजात सर्व मैत्रिणी ट्रेडिशनल डे म्हणून साडी नेसतात तेव्हा सुद्धा जीन्स घातलेली एखादी असतेच ना! सर्व भारतीय हाताने जेवत असतांना एखादा मित्र अगदी पापड सुद्धा काट्य़ाचमच्याने खातो असे अनुभवले आहे का? सर्वजण काटा चमचा वापरत असतांना त्याच टेबलावर हाताने जेवणारा मित्रसुद्धा विरळाच! प्रत्येकवेळी प्रवाहाविरुद्ध वागणारे वेगळे. अनेककदा अनवधानाने असे नको तेव्हा नको तसे वागणारे लोक असतात. लहान मुलांचा हात यात कुणी धरू शकणार नाही. पण अशा वागण्या बोलण्यामुळे नेहमीचे आयुष्य ’जिवंत होत” असे मला वाटते.

आजकाल अनेक घरांमधे बाथरूम बरीच मोठी असते, सजवलेली असते आणि अनेक घरात त्यात पुस्तकांचा रॆक असतो. काही शोभेच्या वस्तू असतात. परत सगळ एवढ चकाचक की आपण लहान असतांनाच्या आपल्या भारतातल्या घरातल्या , चाळीतल्या बाथरूमच्या सर्व कल्पना जुन्या आणि कालबाह्य ठरतील. आमचा एक मित्र रेस्टरुममधे चहा पितो असे मी ऐकले होते. फोनवर बोलणारे, इमेल बघणारे लोक मला माहिती होते. पण चहा पिणे म्हणजे जरा जास्त असे मला अजूनही वाटते. तरीसुद्धा माझ्या घरात पुस्तकपेन , लॆपटॊप इत्यादी गोष्टी बाथरूममधे गेल्या. दोन्ही मुलांचे पॊटी ट्रेनिंग ही महत्त्वाची घटना त्याला कारणीभूत होती. असेच एकदा मराठी बालगीते कानावर आली आणि मी दचकलेच! मुलगी बाथरूममधे होती. दीड पावणेदोन वर्षाच्या मुलीचा डायपर सोडवण्याचा म्हणजेच पॉटीट्रेन करण्याचा माझा प्रयत्न जोरात सुरू होता. त्यावेळी जे हवे ते घे, पण तुला या मोठ्या बाथरूमबाहेर जाऊ देणार नाही असा माझा पावित्रा असायचा. त्यामुळे तिची खेळणी, क्रेयॊन, कलर्स, खडू, सिडी प्लेयर असा सर्व जामानिमा अखेर मी तिथेच नेला होता. तिला तिच्या छोट्या पॊटीवर बसवून मी कधी पुस्तकातली गोष्ट सुद्धा सांगितलेली होती. इथेच सगळा घोटाळा झाला होता. पॊटीवर मुलगी चक्क गाणी म्हणत बसली होती. महिन्याच्या आत मुलगी ट्रेन झाली आणि मला हुश्श झाले. मी कोणतेही खेळणे, सिडी प्लेअर इत्यादी मुलाला ट्रेन करत असतांना बाथरूममधे नेले नाही. आधीचा अनुभव गाठीशी होता करणार काय... पण तेवढ्याने काही फरक पडला नाही. मुलाने बाथरूममधे टीश्य़ू पेपरचा रोल उलगडणे, ट्रेश मधे टाकणे, सगळा रोल पॊटीत टाकणे असे उद्योग सुरू केले. शेवटी सर्व वेळ त्याच्या शेजारी थांबून आणि त्याला बोलण्यात गुंगवण्याचा मी प्रयत्न केला. मग सुरु झाल्या गोष्टी, गप्पा आणि गांणी.. कमरेला नुसती चिंधी असली तरी तेवढी त्याला पुरायची. पॆन्ट, चड्डी किंवा डायपर काही असो पण काही तरी गुंडाळलेले आहे ना इतकेच त्याला बाथरूमकडे न जाण्याकरता पुरत असे.
घरातली इतर कामे करता करता मी मुलगा काय करतो आहे याचा अंदाज घेत असायचे. नेमक्या वेळी त्याला बाथरूममधे घेऊन जायचे. अगदी घड्याळ बघून तासादोन तासाने न्यायचा प्रयोग पण झाला. शेवटी त्याच्या चार छोट्या गाड्या बाथरूममधे ठेवल्या. तुला ही गाडी हवी असेल तर जा असे कर तसे कर असे अमीष दाखवले आणि नंतर कधीतरी ट्रेनिंग संपले.

दोन वर्षाचे होईपर्यंत माझी मुले फक्त मराठी बोलायची. पण नंतर शाळेत जाऊ लागली तसे इंग्रजी आले. ..आले म्हणजे काय चांगलेच बस्तान बसले. मुले एखादा श्लोक म्हणायची पण म्हण म्हटले की म्हणतील असे नाही. तेच गणपतीची आरती , देवीची आरती या सर्वांचे..भारतात माझी आजी रेडियोवर अभंगवाणी लावयाची आणि नातवंडांना अभंग पाठ व्हायचे. तशा इथे मीच आरत्या म्हणणे सुरू केले. एक दिवस सकाळची वेळ होती. मुलाने थेट पॊटीवरून आरती म्हणायला सुरु केली! काय बोलणार? नको म्हणू म्हटले तरी पंचाईत आणि म्हणू द्यावे तरी मनाला पटेना. आरती संपल्यावर आरती केव्हा आणि कुठे बसून म्हणायची ते सांगितले शेवटी.. मुलाने ऐकून घेतले आणि सांगितले आबा तर आंघोळ झाल्यावर बाथरूममधे असतांनाच स्तोत्र म्हणतो, पॊटी शेजारी..
गाणे म्हण असे सांगितल्यावर गाणे म्हणणे असे आज्ञाधारक वागणे त्यांच्या स्वभावात नसावे किंबहुना नव्हतेच. काही कर म्हटले की एखादी स्प्रींग असल्याप्रमाणे का”? हा प्रश्न आलाच पाहिजे. म्हणूनच मुले कोणासमोर काही शिकवलेले करुन दाखवतील याचा नेम नसायचाच. म्हण म्हटले की म्हणायचे नाही एवढेच त्यांचे समीकरण पक्के होते. म्हणू नको म्हटले की ते ऐकतील याची खात्री मात्र नाही! शाळेतही प्रश्न सोपा वाटला मग कशाला उत्तर लिहायचे असे उत्तर मी मुलीकडून ऐकले आहे.
जशी चार पाच वर्षाची झाली तशी मुलगी झोपेत मराठीत बोलण्याऐवजी इंग्रजी बोलू लागली. मुलामधे तीन वर्षाचे असतांनाच हा बदल जाणवला. पण अमेरिकेत दुकानात, मॊलमधे, विमानतळावर असतांना तुम्हाला जे काही विचारायच आहे ते इतरांना कळू नये असे असेल तर मराठीत विचारत जा , उगीच तुमची शेरेबाजी नको कळायला इतरांना असे मी म्हणत असते. त्यामुळे साधारणपण सावर्जनिक ठिकाणी मुले प्रश्न विचारतात/ माझ्याशी मराठी बोलतात. गेल्या भारतभेटीत आम्ही एका मित्राकरता लॆपटॊप घेऊन जात होतो.
मुंबईत कस्टम अधिकायाने विचारले ,’ हा लॆपटॊप तुमचा आहे का”?
'हो '
तेवढ्यात मुलीने मराठीत उत्तर दिले,’ काकाचा आहे असे का म्हणालीस मी वापरते म्हणाले तर मग ?’तिचे वेगवान अमेरिकन मराठी त्याला कळायच्या आत ’ काकाचा म्हणजे आमच्या एका मित्राकडे पण हेच मॊडेल आह” अशी सारवासारव त्यावेळी करावी लागली.

खर बोलाव पण जर समोरचा दुखावत असेल तर नको बोलू खर असे अतिशय क्लिष्ट सल्ले आपण मुलांना देत असतो. . माझी मुलगी एका वाढदिवसाला गेली होती. तिथे असणारा केक तिला आवडला नाही म्हणून तिने संपवला नाही. कारण विचारल्यावर तिने बिनधास्त नाही आवडला असे सांगितले. इतकेच नाही तर ’आई तू खा म्हणजे वाया गेला असे तुला वाटणार नाही” ही टिप्पणी सुद्धा केली. सुदैवाने तो विकत आणलेला केक होता म्हणून बरे नाही तर तिच्या मैत्रिणीच्या आईचा चेहरा बघण्यासारखा झाला असता. भारतीय आई, तिने केलेला पदार्थ आणि ही चांगला झाला नाही म्हणते आणि खात नाही म्ह्णजे संपलेच सगळे:) आपल्यासमोर आपण केलेल्या पदार्थांना नावे ठेवणारी मुले तोच पदार्थ शेजारी मिटक्या मारत खातात. कधी वर माझ्याच आईने केले तेच चांगले असे मित्राच्या आईला तोंडावर सांगतात. त्याउलट आपल्या घरी आले की इतरांच्या ड्ब्यातल्या पदार्थाचे कौतुक करतात.

अमेरिकेतील भारतीय मुलांची इतर मुलांमधे सामावले जावे म्हणून धडपड सुरु असते. चायनीज , कोरियन, स्पॆनिश याला अपवाद नाहीत. वर्गातले चिडवणे, मित्रमैत्रिणी त्यांचा स्वभाव अशी अनेक कारणे त्यामागे असतील. अर्थात समाजात राहून इतरांसारखे वागावेसे वाटणे , त्या समाजाचा एक घटक व्हावे असे वाटणे हे साहाजिक आहे. बाहेर एखादा स्वेटर लागेल एवढी थंडी असतांना मी अनेक मुली बिनबाह्यांचा शर्ट किंवा ड्रेस घालून आल्या आहेत असे बघते. इतर भारतीय मुली सुद्धा तसेच करत असतात. माझी मुलगी सुद्धा मधेमधे तसा प्रयत्न करून पाहते. त्यावेळी तिला विचारते की उन्हाळ्यात काय करशील? ह्या मुली ऐन उन्हाळ्यात आणखी किती कपडे कमी करतील? का मध्येच लक्ष वेधून घेण्याकरता ,मुद्दाम उठून दिसावे म्हणून अंगभर कपडा घालतील असा विचार डोकावतो.
समाजात वावरतांना नकळत प्लीज, थॆक्यू तोंडात येते. मुलांनी एखादे काम चटकन केले की सुद्धा थॆक्यू म्हणते मी. पण घरात असले की प्रत्येकवेळी एखादी वस्तू मागतांना त्यांनी प्लीज म्हणावे असे मला वाटत नाही, अनेकदा त्यांचा टॊन कसा आहे, प्रश्नाचा रोख कसा आहे ते सुद्धा मला महत्त्वाचे वाटते. ते सर्व ठीक असेल तर मी तसा प्लीजचा आग्रह करत नाही. पण मग आई बाबा एकमेकांशी बोलतांना प्लीज थॆक्स करत नाही हे मुलांना दिसत असतेच. कधीतरी रागावून त्यांना म्हटले असे विचारायचे असते का तेव्हा लगेच उत्तर येते, "तू कुठे म्हणतेस? "
बाहेर सुद्धा मग कधीतरी ही मुले प्लीज थॆक्स विसरले की सरळ उत्तर देतात आम्ही कुठे घरी असे सारखे म्हणतो..

एखाद्या नॊन व्हेज खाणाया व्यक्तीला सारखे नॉन व्हेज खाणे चांगले नाही असे तिच्या तोंडावर काही सांगायचे नाही, ते तिला आवडणार नाही असे मी मुलीला सांगत होते. तू दुसरा विषय शोधून त्यावरच बोलत जा . 'त्यावर मुलगी म्हणते,' आई एखादी गोष्ट जर एका व्यक्तीकरता चांगली नाही तर ती इतरांकरता कशी असेल?ती माझी मैत्रिण आहे ..तिला मी हे सांगणारच. तूच तर म्हणतेस खरे बोलत जा! '

मुलीने आतापासूनच मेकअप करू नये म्हणून मेकअप न करण्याकडे माझा कल असतो. ही रंगरंगोटी शेवटी कृत्रिम आहे आणि त्वचेला त्याने त्रासच होते असे माझे म्हणणे असते. मुलीचा कथकचा कार्यक्रम असेल तेव्हाच तिला मेकअप करता येतो. माझा मुलगा तेव्हा सारे कुतूहलाने बघत असतो. आमचे बोलणे ऐकत असतो. असाच एकदा मेकअप करण्यावरून वाद झाला होता. नेहमी मेकअप न करणारी माझी अमेरिकन शेजारीण त्या दिवशी आमच्याकडे आली ते जोरदार मेकअप करून!. तिची खर अपेक्षा असावी मी काहीतरी बोलेन अशी. सुदैवाने मुलगी गप्प होती पण मुलगा तिला म्हणाला,’ तू लिपस्टीक लावलेस का?’ कुणीतरी नोंद घेतली याचा आनंद तिच्या चेहयावर होता. तिने का मेक अप केला यावर ती भरभरून बोलली.
मुलगा तिला म्हणाला,’ तू लिपस्टिक काढ , लावू नकोस तुला बाऊ होईल!”
अशाप्रकारे मुलांना खरे बोलण्याचा उमाळा, प्रामाणिकपणाचे भरते नको तेव्हा आले नाही तरच नवल!

कधीतरी वेडीवाकडी तोंडे करणे, डोळे तिरळे करणे,चित्रविचित्र आवाज काढून मुलांना खेळवण्याची अनेक पालकांची सवय असते. थोडा विरंगुळा, थोडी मजा असा जरी त्यांचा हेतू असला तरी मुलांना भलताच इशारा मिळतो. जो पालकांच्या गावीही नसतो. मुले सुद्धा मग मुद्दाम असे गंमतशीर वागायला लागतात. घटाघटा आवाज करत पाणी पिणे, मोठ्याने खोट्या ढेकरा देणे , जीभ वेडावणे हे प्रकार करतांना मुलांना पाहिले आहे का? आपल्या पालकांच्या उपस्थितीत जेव्हा ती अशा काही गमती करतात, वर पालकांचे नाव घेतात तेव्हा तर पालकांचा चेहरा अगदी बघण्यासारखा असतो.

वागण्याबोलण्यात असलेले अंतर मुलांना चटकन कळते. पण रोजच्या जगण्यात दांभिकपणा, विसंगती किती ठासून भरलेली असते. मित्रमंडळी नात्यागोत्यातली मंडळी अशा कोणावरही टीका अथवा गॊसिप न करणेच बरे. आईवडील नावे न घेता बोलले तरी त्यांना अशावेळी नेमके सगळे संदर्भ लागतात. डायनोसॉर किती वर्षांपूवी अस्तित्त्वात होते, चंद्रावर प्रथम कोण गेले, भारतात किती भाषा आहेत हे तर सोडाच पण अमेरिकन आयडॉल कोण होईल किंवा आयकार्ली सुटीत काय करणार आहे या प्रश्नांचेही त्यांना कुतूहल वाटले नसेल एवढी जिज्ञासा अशा नको त्या वेळी मुलांच्या मनात अचानक जागृत होते. असे संकटात टाकणारे वागणे काय एकतर्फी असते का? जशी मुले मोठी होतात, त्यांचे विश्व तयार होते तेव्हा पालकांचे वागणे त्यांना विचित्र वाटू लागते. सल्ले देण्याची दिशा बदलली आहे असे जाणवते. कधी कधी ही वाहतूक वेगाने आणि दुतर्फा चालू असते तेव्हा तर विचारायलाच नको. मुले टीनएजर असण्याचा हा काळ अवघड असतो दोघांकरताही! कालांतराने मुले आणखी मोठी होतात. त्यांची लग्ने ठरतात, होतात, ते आईबाप होतात.. तेव्हा ही दिशा उलट होते. मुले ऐकत नाहीत,मुले चुकीचे वागतात, याची जागा मग माझ्या आई वडिलांना काहीच कळत नाही याने घेतलेली असते. पालकांना कळले नसते तर तुला अक्कल कशी आली हा प्रश्न विचारून फायदा नाही... ही फक्त गंमत असते आणि ती अनुभवण्यात असते खरी मजा.

Tuesday, July 27, 2010

बाबा रिक्षेवाला

बाबा रिक्षेवाला

मुलीला शाळेत सोडण्याकरता येणाऱ्या बसची वाट बघत आम्ही उभे होतो.
"आई, माझ्याएवढी असताना तू कशी जायचीस शाळेत? माझ्यासारखीच बसने? " मुलीने उत्सुकतेने विचारले.
" आम्हाला रिक्षेवाला यायचा न्यायला. " तिला हे उत्तर देताना माझ्या डोळ्यासमोर बाबा रिक्षेवाल्याचा चेहरा आला.
"ओह, तुम्ही ऑटोरिक्षातून शाळेत जायचा" रिक्शाचे नाव ऐकताच मुलगी म्हणाली. तिने शाळेच्या गणवेशातील मुलांना पुण्यात असताना ऑटोरिक्षाने जाताना पाहिले होते.
''नाही तसे नाही, सायकलरिक्षा.... '. पण सायकलरिक्षा म्हणजे नक्की काय? ते सांगताना माझा आवाज खोल गेला होता.
"बाप रे! तो एकटाच एवढ्या मुलांना न्यायचा! " मुलीची प्रतिक्रिया स्वाभाविक आणि अपेक्षित अशीच होती.
एक माणूस इतर माणसांचे ओझे वाहून नेतो, तेही एवढ्याशा मोबदल्यात हे तिला सांगताना मी खजील झाले होते. आज अमेरिकेत तर नाहीच पण पुण्यामुंबईसारख्या शहरात हातरिक्षेवाले चटकन दिसणार नाहीत. शाळाकॉलेजला जात असताना सायकलचे पायडल मारताना चढावर होणारी दमछाक मला आजही आठवते. त्याचवेळी आजूबाजूला 'सवारीला' ओढणारे रिक्षेवाले कुठे दिसले की मला 'बाबाची ' हटकून आठवणही येत असे याचेही तेवढेच स्मरण होते.
"आई, तुझा रिक्षेवाला काका खूप स्ट्राँग असेल नाही? "
तिच्या प्रश्नाचे उत्तर देताना मी लहानपणचे रिक्शाने जाण्याचे दिवस आठवू लागले.. खरंच कसा होता बाबा?

बाबा झब्बा पायजमा घालायचा. त्याचे डोक्यावरचे आणि दाढीचे केस होऊ लागले होते. बाबा बारीक चणीचा पण उंचापुरा होता. बाबाचे डोळे बारीक होते आणि उन्हाची तिरीप आली की ते अधिकच मिचमिचे होत. डोळ्यावर येणारी टोपी असली की त्याचे डोळे शोधावेच लागत! त्यावेळी बाबाचे वय अंदाजे पन्नाशीच्या जवळ असावे. सकाळी बरोबर नवाच्या ठोक्याला तो हजर होत असे. पुढे अर्धा तास जवळपासच्या सोसायट्यांतून मुले रिक्शांत भरून आम्हा मुलांना साडेदहाच्या शाळेला वेळेत नेण्याची जबाबदारी त्याची होती. किती कडक थंडी असली, जोराचा पाऊस पडत असला अथवा रणरणते ऊन असले तरी आम्हाला सोडायला रिक्षा नाही असे झाले नाही. तो स्वतः आला तर नव्याच्या ठोक्याला नाहीतर त्याने नेमलेल्या बदली रिक्षेवाल्याची हाक साडेनवाला ठरलेली असे. सवारी नेण्यासाठी रिक्शांत एक मोठी मुख्य सीट होती. तिच्या बरोबर दुसऱ्या बाजूला एक लाकडी फळी. या दोन्हीवर मुले बसत. रिक्षाच्या दोन्हीकडून आत शिरता येई. एकदा का मुले आत बसली की बसली की बाबा आधीच सीटखालून काढलेल्या फळ्या दोन्ही बाजूला लावून ठेवी. त्यावर तीन तीन मुले बसत. सीटखालची मोकळी जागा म्हणजे जणू खजिनाच होता. त्यात तीनचार फळ्या, फडकी, रिक्षादुरुस्तीचे कामचलाऊ सामान आणि पावसापासून बचावाकरता एक मोठे मेणकापड असे. पावसाळा सोडून इतर वेळी मोठ्या सीटच्या मागच्या बाजूला; जिथे ऊन्हापासून बचाव करण्याचे छत अडकवलेले असे त्या कापडाच्या मधल्या खिडकीत तीन जरा उंच आणि वयाने मोठी असणारी मुले बसत. याला बाबा बाल्कनीची जागा म्हणत असे!

रिक्षा चालवताना बाबा सदऱ्याच्या बाह्या अर्ध्याहून कमी होतील अशा आत दुमडून ठेवायचा. पायजमा रिक्शांत कुठे अडकू नये म्हणून दोन्ही पोटऱ्यांवर तो एक जाड कडे घालत असे आणि त्यात पायजम्याचे पाय दुमडून ठेवत असे. तो पायात काळ्या रंगाच्या चपला घाली. त्या चपलांना चांभाराकडून कित्येकदा जोड लावावा लागे. रिक्षा चालवता चालवता बाबा रस्त्याच्या कडेला अचानक थांबला की बहुधा दोनच कारणे असत! एक म्हणजे रिक्शाची चेन पडलेली असायची नाही तर बाबाच्या चपलेचा जोड तुटलेला असे. सरावाने आम्हाला चेन पडलेली नाही ते ओळखता यायचे म्हणजे बाबाची चप्पल तुटलेली आहे तेही समजायचे. हाताने जर चपलेचा जोड पुन्हा बसवता आला तर बाबा चप्पल घालून रिक्षा चालवू लागे. पण तसे फार कमी वेळा व्हायचे. मग बाबा सीटवर बसलेल्या मुलाला उठायला सांगे आणि सीटखाली असलेल्या जागेत आपल्या वाहणा ठेवून देई आणि तसाच अनवाणी पायांनी रिक्षा चालवत असे.
"बाबा, माझ्या डॅडींच्या चपला कधी तुटत नाही. तशा चपला तू का घालत नाहीस? "
"आपके डॅडी स्कूटर चलाते है इसलिए चप्पल अच्छी रहती है".
" माझे वडील बूट घालून जातात ऑफिसला, ते कधीच तुटत नाहीत. मी त्यांनाच सांगते तुलापण तसे बूट द्यायला"
त्यावर बाबा हसायचा. मुलांचे कौतुक करायचा... मी पण तशा चपला घालेन म्हणायचा...

पावसाळ्याच्या दिवसात तो भलामोठा रेनकोट आणि उन्हाळ्यात तो अगदी डोळ्यावर येईल अशी टोपी घालायचा. त्याला तरीपण दिसते कसे याचे कोडे मला त्या डोळ्यावर आलेल्या टोपीमुळे पडत असे. तो गळ्याभोवती आणि खिशात मोठे फडकेवजा रुमाल ठेवायचा. कुणाच्या इजा झाली, कुणाचा शर्ट भिजला असे काही झाले तरी बाबा त्याच्याजवळच्या फडक्याने तात्पुरते काम भागवी. आमच्या रस्त्यावर असणाऱ्या एका गोलाकार घुमटापुढे बाबा कधी रिक्षा थांबवत असे. खिशातून एक विशिष्ट मोठे फडके जमिनीवर अंथरे. डोके टेकवून काहीतरी पुटपुटत तो पुन्हा रुमालाची घडी खिशात ठेवून रिक्षा चालवायला सुरुवात करी. त्याचे ते पुटपुटणे सोडले तर इतर वेळी त्याचा आवाज चांगला खणखणीत होता.

'बेबी चलो' अशी त्याची हाक यायची तेव्हा माझे जेवण सुरू असे. जेवताना केवळ सवयीने घास तोंडात जायचा अन्यथा माझे कान आणि डोळे बाबाच्या हाकेकडे असत. सोसायटीच्या एका टोकाकडून एक एक करत तो मुलांना बोलवत असे. आईची हाक जशी मुलांना समजते तसेच बाबाच्या हाकेचेही झाले होते. तयारीला वेळ घेणाऱ्या मुलाला बाबा एका विशिष्ट पहाडी आवाजात हाक देई. रिक्शांत बसून भांडणे करणाऱ्या, खोड्या काढणाऱ्या मुलांना बाबा टोपणनावाने पुकारायचा. बालवाडीतल्या लहान मुलामुलींना तो ममतेने बोलवी. बेटी, बेबी, रानी किंवा मेरा राजकुमार असे म्हणून तो त्यांना संबोधत असे. सकाळची शाळा असली की तो मुलांच्या नावाने एकापाठोपाठ दोन हाका देई आणि गमतीने म्हणत असे की पहिली हाक मुलाच्या आईवडीलांकरता आहे!.
या आठवणी आम्हा मुलांच्या शहरात टेलेव्हिजन दिसू शकत नव्हता तेव्हाच्या म्हणजे साधारण १९८०-८३ च्या आहेत. माझी प्राथमिक शाळा गावात असणाऱ्या एका भल्यामोठ्या थिएटरशेजारी होती. जाता येता कानावर पडणारी सिनेमाची गाणी, सिनेमाचे संवाद आणि आपल्या रिक्षेवाल्याची भाषा यात साम्य आहे एवढे कळले होते. सरावाने आम्हाला ती कळायची आणि आमचे मराठी बोलणे त्याला समजायचे!

रिक्शांत बसायची इतर मुलांप्रमाणे मलाही नेहमी घाई असे. त्यामुळे जेवण लवकर होई. पण दुसरीकडे काही न खाताच जायची माझी तयारी असायची कारण रिक्शांत एखाद्या ठराविक जागा कधी हवी असायची. कधी मैत्रिणीजवळ बसायचे असायचे. एवढ्या बारक्या रिक्शांत कमीतकमी पंधरा मुले कोंबलेली असायची. त्यावेळी त्याचे काही वाटायचे नाही. कुणाचे पाय बाहेर लोंबताहेत, कोणी हात न धरताच बसला आहे, एका जरा वयाने मोठ्या मुलाच्या मांडीवर एकमेकांना चिमण्या पिलांप्रमाणे खेटून दोन मुले बसली आहेत यात आम्हाला काही नवल वाटत नसे. साधारण सर्व शाळेच्या रिक्शांत असेच दृश्य असे. पण आज विचार केला तर ते सगळंच अद्भुत वाटत. चढ आला की बाल्कनीत बसलेली मोठी मुले रस्त्यावर उड्या टाकत आणि मागून हाताने रेटा देऊन रिक्षा लोटू लागत. कधी सर्व मुले खाली उतरून त्याच्या मागे चालू लागत. मग बाबाला वेगाने रिक्षा ओढणे शक्य होई. बाबाला अशी मदत करण्यासाठी आमच्यात जणू स्पर्धाच असे. मग आम्ही भांडू नये म्हणून बाबा आम्हाला वार आणि फेरी नेमून देई. नियमितपणा, कामाचे विभाजन, टीमवर्क आणि वेळेचे महत्त्व बाबाने जाणले होते; आम्हालाही नकळत शिकवले होते.

बरेचदा नव्याने येणाऱ्या मुलाचा रिक्शाने जाण्याचा किंवा कित्येकदा शाळेचा पहिला दिवसही बाबामुळेच सुकर होत असे.
"देखो आज हमारे साथ कौन राजकुमार आया है. इसे आपके साथ बैठने दो'' असे म्हणून बाबा त्या मुलाला सीटवर नीट जागा करून देई. बाबाचे बोलणे ऐकून नव्याने रिक्शांत आलेला मुलगा रडण्यातूनच जरा हसरा चेहरा करे. बाबाने दिलेली लिमलेट खाता खाता इतर मुले त्याच्याशी बोलण्यात दंग होत. एकीकडे वाहत्या रस्त्याचे अवधान सांभाळून तो आमच्याशी बोलत असे. दोन्ही वेळेस रेल्वेचे रूळ ओलांडून आम्हाला पुढे जावे लागे. आतासारखे रेल्वेक्रॉसिंग सर्व ठिकाणी तेव्हा झालेले नव्हते. गाडी येत नाही ना, एवढी खात्री करायची आणि रूळ ओलांडायचा! एवढाच नियम. निघायला थोडा उशीर झाला तर रेल्वेकरता थांबावे लागे. दूरवर रेल्वे दिसत असली तरी आपण जाऊ शकू असे त्यावेळी रिक्शातल्या मुलांना वाटायचे.
"बेटा, दो मिनट रूक जाओ. दोन मिनटसे देर होगी, पर ये जिंदगी बडी किमती होती है. गाडी के जाने के बाद हम निकलेंगे. और हम कल से वक्त पर निकलेंगे"

किती साध्या शब्दात त्याने आम्हाला जीवनाचे महत्त्व सांगितले होते. आजही सिग्नलकरता चौकात उभे असताना, कुठे रेल्वेक्रॉसिंग करत असताना त्याचे शब्द आठवतात. सिग्नल तोडणारे बघितले की वाटते स्पर्धेच्या युगात आपल्या जीवाचे मोल न ओळखण्याएवढे आपण बदलतो का?

एखादा मुलगा वॉटरबॅग विसरला तर त्याला प्यायला बाबा स्वतःजवळचे पाणी देई. रिक्शांत बसलेल्या आपल्या सख्ख्या भावंडापेक्षा कित्येकदा मुले बाबाशीच जास्त बोलत. आम्ही रिक्शांत बसून गाण्याच्या भेंड्या, एकाच अक्षरापासून सुरू होणारे वेगवेगळे शब्द असे खेळ खेळत असू.
"नाही, मी गाणे म्हणणार" असा आवाज आला तरी तोवर दुसऱ्याने गाणे सुरू केलेले असे.
"मला म्हणायचे होते, थांबला का नाहीस? "
"पण हे गाणे तर झालेच आहे".
"चिडका आहेस तू"
"याला खेळायलाच नको घ्यायला"
एकमताने निर्णय होई.
"बाबा, मला खेळायला घेत नाहीत. पाहा कसे करतात" मुलगा हुकमी अस्त्र काढे. तोवर त्या मुलाचे रडणे, नाक वाहणे सगळे अगदी शिस्तशीर सुरू झालेले असे.
'' बेटा सब मिलके खेलो" बाबा समजावणीच्या सुरात आम्हाला चार गोष्टी सांगे. पुन्हा खेळ सुरू होई.
एवढ्याने काम झाले नाही तर कधी बाबा ' चूप रहो' असे मोठ्याने ओरडून आम्हाला गप्प करत असे. तर कधी इतरांना त्रास देणाऱ्या मुलाला 'शाळेतच ठेवेन घरी नेणार नाही' असा दमही बाबा देत असे. प्रसंगी पालकांकडे तक्रार सुद्धा नेत असे. कानावर तक्रार आली तरच पालक मध्ये पडत. माझ्या तक्रारी घेऊन घरी येण्याची वेळ त्याच्यावर महिन्यातून दोनचारदा तरी येई. तो वऱ्हांड्यात उभा राही आणि माझी आई त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेई. पण ती सगळी वादळापूर्वीची शांतता हे वेगळे सांगायला नकोच. आमच्या घरात धुणेभांडीवाली आणि कचरा नेणारा राजू येत असे. ते घरात येत. हे आजीला चालायचे पण बाबा दारात उभा राहायचा तरी आजी त्याला कधी आत ये म्हणत नसे. हे असे का? त्याचे कोडे पुढे उलगडले. नमाज पढणारा बाबा मुसलमान आहे हे आजीला माहिती होते आणि नक्कीच ते आजीला खटकत असे. त्यावरून मी तिला प्रश्न विचारून भंडावत असे.
" बाबा मुसलमान आहे तर काय झालं? "
"आपलं वेगळं असत.. "
"म्हणजे? "
"त्याचा देव वेगळा आपले वेगळे, त्याचे खाणेपिणे वेगळे.. "
"पण देव तर सगळीकडे असतो ना? राम, कृष्ण, विष्णू एक आहे तूच म्हणालीस ना? तर मग त्याचा देव का वेगळा? त्याच्या वॉटरबॅगमधले पाणी आपल्या पाण्यासारखेच लागते. " माझे बोलणे सुरूच राही.
शेवटी आई मध्यस्थी करायची आणि विषय बदलायची.

बाबा आम्हाला आमच्या सवंगड्यांप्रमाणे वाटे. शाळेत शिक्षिका काय म्हणाल्या, घरी काय झाले त्याची सर्व कहाणी कित्येक मुले त्याच्या कानावर घालत. आई रागावली, वडील बाहेरगावी गेलेत, आजोबा आजारी आहेत; सर्व त्यात आले. बाबा ते ऐकून घेई. मुलांचे दप्तर, रुमाल, डबे, वॉटरबॅग, फीचे पैसे सगळ्याचा हिशोब त्याच्याजवळ असे. ज्या विश्वासाने आम्हाला त्याच्या हातात सोपवले होते तो विश्वास सार्थ होता यात शंका नाही. चोरी म्हणजे नक्की काय याची कल्पना त्यावेळी नव्हती. जे आपले नाही ते घ्यायचे नाही, दुसऱ्याची वस्तू न विचारता घ्यायची नाही. एवढे मात्र पक्के होते. एकदा एका मुलाने त्याचे फीचे पैसे रिक्षावाल्याला न देता स्वतःच्याच खिशात ठेवले. फी पूर्ण मिळाली नाही अशी चिठ्ठी शाळेतून आली. मुलाच्या वडिलांचा आरडाओरडा बाबा रिक्षावाल्याने ऐकून घेतला, तो फक्त मी पैसे घेतले नाही एवढे म्हणत होता. आम्ही मुलांनी तेच सांगितले पण आमच्या कडे कोण लक्ष देतंय? त्या मुलाने आमच्या रिक्शाने येणे बंद केले. पुढे वडिलांना नक्की काय घडले याची पत्ता लागला... मुलाला बाबाच्या रिक्शाने पाठवण्याची त्यांची तयारी होती. पण 'आता माझ्या रिक्शांत जागा नाही' असे त्याचे उत्तर अजूनही लक्षात आहे.
त्याच्या रिक्शांत बसणाऱ्या प्रत्येक मुलाच्या घरच्या परिस्थितीपेक्षा बाबा अधिक आर्थिक अडचणीत होता. तो पुढच्या महिन्याचे पैसे आधीच मागत असे हे आठवत आहे. पण पैशाकरता कधी आमच्या वस्तू, फीचे पैसे घेणे आणि त्यावर पांघरून घालणे असे प्रकार त्याने केले नाहीत. याचे महत्त्व आता अधिक वाटते.
.............................

घर बदलले, शाळा बदलली. काही वर्षे शहरातून जाता येताना जुन्या शाळेच्या चौकात हटकून बाबा दिसत असे. पुढे आम्ही दुसऱ्या शहरात बदलून गेलो. रिक्शाने, बसने शाळेत जाणे सुटून पुढे हातात स्वतःची सायकल नंतर कॉलेजात कायनेटिक आली. बाबाची आणि माझी गाठभेट गेले कित्येक वर्षे नाही. त्याविषयी माहिती देणारे सुद्धा आता कुठे आहेत कल्पना नाही....
मुलीला शाळेत सोडतांना बाबाच्या आठवणी ढगाळलेले आकाश दूर करून मनात डोकावतात एवढे नक्की...

-सोनाली जोशी
(पूर्वप्रकाशित, एकता दिवाळी २००८)

स्वतःत इतुका चूर राहिलो...

स्वतःत इतुका चूर राहिलो...


सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वतःभोवती विचार फिरत असतात असे कधी जाणवले आहे का? घड्याळाच्या गजराने जाग येताच कधी फुलाच्या पाकळ्यावरचे दवबिंदू दिसतात का? सूर्याची किरणे आसमंत उजळून टाकतात त्यांना तरी कधी डोळे भरून बघतो का? डोळ्यांना हे सर्व दिसत असते तरी मन मात्र ज्याची नोंद करते ते याहून वेगळेच असते . मनात नेहमी गजराचे घड्याळ, ईमेल,मोबाईल आणि समोर उभा असलेला कामाचा डोंगर असतो. मला या ठिकाणी जायचे आहे, मला ही वस्तू हवी आहे, मला असा त्रास होतो आहे. अशाप्रकारे मन फक्त स्वतःचा विचार करत असते.आत्मकेंद्री असण्याची सुरुवात नेमकी केव्हा होते? एखादं लहान मूल मला खेळणी हवी,बाहुली हवी, असाच फ्रॉक हवा, डब्यात शिराच हवा असा सारखा हट्ट करत असत तेव्हा ते स्वतःचा विचार करत असत. आजी आजोबा आणि नातवंड यांचा घरातील टीव्हीचा ताबा कोणाला मिळावा यावर वाद चालू असतो याचे मजेशीर वर्णन प्रवीण टोकेकरांनी 'तथ्यांश' सदरातील एका लेखात केले आहे. लाड, व्यक्तीस्वातंत्र्य आणि आत्मकेंद्री असणे या कारणांमुळे घरात कसा संघर्ष होतो याचे ते एक बोलके उदाहरण आहे.

एका चौकात एक सायकलवाला एका गाडीवर आदळला. चूक दोघांचीही होती. सायकलवाला वाचला पण त्याला मार मात्र लागला होता. इतर वाहनांची धडक त्याला लागली नाही हे नशीब. गाडीवाल्या माणसाला सायकलवरच्या माणसाला किती लागले त्याला काही मदत हवी असेल याचे सोयरसूतक नव्हते. त्याच्या मनात पहिला विचार आला तो इन्शुरन्स असेल का, आपल्या खिशातून किती पैसे द्यावे लागतील याचा. माणसाच्या जिवापेक्षा स्वार्थ जास्त महत्त्वाचा हे आजचे धोरण आहे का? मूल मोठे होत जाते तसे संस्कारांनी,अनुभवाने , वाचनाने स्व: पलीकडे बघायची दृष्टी त्याला मिळते . पण अस खऱ्या अर्थाने मोठे होणे आता संपले आहे का?स्वकेंद्री माणसे बघितली की ती फक्त आपल्या वाढलेल्या वयाचे लेबल घेऊन वावरतात असे मला वाटते. त्यांचे मानसिक वय एखाद्या अल्लड मुलासारखे असते परंतू त्यांचा हट्टीपणा मात्र वयाबरोबर वाढलेला असतो.

शाळा,अभ्यास,कॉलेज ,स्पर्धा, ऑफिस ,घरकाम अशा आपापल्या व्यापात, ध्येयात माणसाचे मन इतके गुरफटते की जगाचा विसर पडतो.
पण मनातले सगळे विचार जिथल्या तिथे थांबले आहेत, जणू गोठले आहेत अशी कल्पना केली आणि अचानक कधी तुमच्यासमोर चांदण्यांनी भरलेले विलोभनीय आकाश आले तर? सगळे काही नव्याने अनुभवतो आहे असेच वाटेल. उजाडताना पक्ष्यांची किलबिल कानावर येईल. पे आजूबाजूच्या प्रत्येक घटकाचे अस्तित्व जाणवेल. झाडांची पाने, त्यांचे आवाज, फुलांचे ताटवे ,फुलपाखरे , बागडणारी मुले दिसतील. गवतावर पडणारा पाऊस, खिडकीतून दिसणारा, अंगावर रिमझिमणारा पाऊस भेटीला येईल.पण जे दिसेल ते सर्व मनाला आनंदित करेल असे नाही. ज्याकडे काणाडोळा करून पुढे गेलो ते जगातले दु:खसुद्धा नजरेस पडेल. भुकेने कवळवणारी मुले, टोलेजंग इमारतीलगत अंधार्‍या वर्तमानात चाचपडणारी माणसे दिसतील, धुळीचे ,धुराचे लोट जीव गुदमरवून टाकतील, ओसाड ओडकी बोडकी राने दिसतील, भेगाळलेली जमीन दिसेल,कर्जाखाली दबलेला असहाय शेतकरी दिसेल..स्वतःचे दु:ख ,चिंता, आशा आ़कांक्षा यामध्ये माणूस गुंतला की त्याला जगातलं सुखदु:ख जाणून घ्यायला वेळच काढायचा नसतो.

एखाद्याशी समरस झाले तर त्याची भाषा तुम्हाला शब्दाविना कळते. पण असे समरस होऊन जगण्याने मला काय मिळेल हा विचार प्रथम डोकावतो. माझा नफा तोटा काय?हाच जगण्याचा वागण्यातला कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे स्वकेंद्री वक्ती अनेक गोष्टी गमावून बसते. सूर्य रोज उगवतो ,मावळतो .दिवसभरात किती वेगवेगळ्या रंगाची उधळण आकाशात होते . कोवळे किरण ,हळदपिवळी उन्हे, तळपणारा , नजरेला नजर देता येणार नाही असा माथ्यावरचा सूर्य, कधी खिन्न,कधी मनाला प्रसन्न करणारी पश्चिमदिशा दिसते तर कधी कपाळावर लावलेल्या कुंकवासारखे लक्ष वेधून घेत मावळतीला सूर्यबिंब समोर ठाकते. या सर्व रंगाची भाषा , त्यांचे सौंदर्य बघायला वेळ काढावा लागतो. केवळ नुसता वेळ असून भागत नाही तर स्वमधून बाहेर येण्याची इच्छा असावी लागते अन्यथा चांदण्या रात्री संगमरवरी ताजमहालसमोर उभा राहूनही स्वतःमध्ये गुरफटलेल्या व्यक्तीला ताजमहाल आणि चांदणी रात्र या दोन्ही आनंदाला पारखे व्हावे लागते ते उगीच नाही.

स्वतःत गुंतणे म्हणजे स्वतःचा आनंद, स्वतःचे हित याचाच सारखा विचार तर आलाच पण त्याबरोबर स्वतःचे दु:ख,वेदना, चिंता यात मग्न असणे हे सुद्धा आलेच. अशा व्यक्ती मग केवळ त्यांना हवे तसे किंवा जे नको त्याचाच विचार करतात. त्यावर बोलतात, त्याचा प्रचार करतात प्रसार करतात. आनंदाने भारलेल्या व्यक्तीला जग निदान आनंदी भासते पण प्रेमभंग झालेल्या व्यक्तीला कधी एकमेकांच्या हातात हात घालून , एकमेकांच्या डोळ्यात हरवलेल जोडपं दिसलं तरी ती दोघे एकमेकांना सोडून जातील याची खात्री वाटत असते तशी दु:खात बुडलेली प्रत्येक व्यक्ती समोर दिसणारा प्रकाश न बघता, नक्षत्रांनी भरलेले आकाश न बघता कातर संध्याकाळ आणि कोळोखातली खिन्न रात्रच बघत असते.


व्यक्ती स्वकेंद्री झाली की मग तिचा स्वार्थ, अहंकार, मानापमान बळावत जातो. त्यामुळे ती अनेकांपासून दुरावते. अनेकांना दुखावते.
आत्मकेंद्रीपणा वाढल्यास फायदा तर दूरच राहिला व्यक्तीच्या वाट्याला दुःखे आली नाहीत तर नवल. एका लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या जाहिरातीत एक लग्नाळू मुलगा अनेक मुली नाकारताना दाखवला आहे. '

ही अशीच आहे, ती तशीच आहे,हिचे डोळे घारे नाहीत, ती गोरी नाही' असे करत तो मुलींचे फोटो हातावेगळे करत असतो. जाहिरात जशी पुढे जाते मुलाचे वय वाढलेले दाखवले आहे. शेवटी डो़क्याला टक्कल, दात पडलेले, तो जख्खड म्हातारा दाखवला आहे. फोटो पुढे सरकतच आहेत, अचानक तो म्हणतो मला हिच्याशी लग्न करायचे आहे..निवेदिका उत्तरते ही तू जी मुलगी नाकारली होतीस तिची नात आहे आणि आत्ताच समजले की हिचेही लग्न ठरले आहे..
किती काळ निघून गेला पाहा. माझ्यामते ही जाहिरात आत्मकेंद्रीपणा किती घातक ठरू शकतो याचे उदाहरण आहे.

माणसे एकत्र येतात, एकमेकांना भेटतात, प्रसंगी आनंदाचे दु:खाचे क्षण एकत्र जगतात असे दिसले तरी पण ती आपल्याच जगात असतात, स्वतःतच मशगुल असतात. आपापल्या नफ्यातोट्याची गणिते मांडत असतात. आपले हिशोब जुळवत असतात. अनेक मोठमोठ्या समारंभात, उत्सवात मग अशी आत्मकेंद्री माणसांची कधी न भेदता येणारी वर्तुळे दिसू लागतात. त्या वर्तुळामध्ये घुमत असते केवळ आत्मधून- स्वार्थाची, मी पणाची !
स्वार्थाचे, अहंकाराचे वाढते कवच बघून वर्तुळाच्या केंद्राला छेदणे, स्पर्श करणे दुरापास्त वाटू लागते असा अनुभव आला आहे का? जसे एखाद्या उंच पर्वताचे शिखर गाठणे अवघड असते , सागराचा थांग लागणे कठीण असते त्याहूनही अशक्यप्राय गोष्ट म्हणजे आत्मकेंद्री माणसाला बाहेरच्या जगाची नोंद घ्यायला लावणे. जगात सर्वच माणसे अशी आत्मकेंद्री आहेत का? तसे असते तर माणुसकीचा विसर पडला असता. सुदैवाने सरसरकटपणे तसे अजून तरी झालेले नाही. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा अभूतपूर्व ठसा उमटवलेली माणसे ध्येयाने भारलेली असतात, त्यामुळे त्यांना जगाचा विसर पडतो .पण मिळालेला पैसा,सत्ता, यश आणि प्रसिद्धी यामुळे खरं अशी माणसे खूप आत्मकेंद्री व्हायला हवीत परंतू तसे नेहमी आढळत नाही. अशा व्यक्तींना जगातले दु:ख दूर करावेसे वाटते, तसेच त्यांच्या आनंदात इतरांनी भाग घ्यावा असे वाटते. आपण सुद्धा 'स्व'च्या बाहेर डोकावायला काय हरकत आहे? मी ,माझं, मला ,या 'मी' पणाने पेटलेले पलिते काही काळ विझवले तर जग काळोखात बुडणार नाही उलट एका सुंदर जगाकडे नेणारी प्रकाशरेषाच सापडेल.!

बा.भ.बोरकरांच्या या ओळी किती समर्पक आहेत बघा.

"स्वरी आतल्या रुतलो इतुका
जन वन झाले मुके
त्याचमुळे का त्रिभुवन सगळे
नवेच मजला पुन्हा?
जो देखावा बघतो तो तो
पूर्विहुनी देखणा"…………….

Wednesday, May 5, 2010

आता कशाचा रिकॊल करणार?

आता कशाचा रिकॊल करणार?
काही ग्राहक तक्रार नोंदवतात,कधी निर्मात्यावर खटला भरतात, नुकसानभरपाई मागतात आणि मग निर्माता आमचा माल खराब आहे , त्यात काही दोष आहेत हे मान्य करतो आणि सर्व ग्राहकांकडून माल परत घेतो, त्या सर्वांना त्याचा मोबदला देतो; आणि हे अनेकदा घडते . उत्पादकाचे हे असे वागणे कधी काळी मला मला अशक्य कोटीतले वाटत असे. भारतात होते तेव्हा ग्राहक चळवळ अस्तित्त्वात असली तरी तिची ताकद आणि मर्यादा मला चांगल्याच ठाऊक होत्या. आता कदाचित काळच बदलला आहे त्यामुळे भारतातही ग्राहकांची स्थिती बरी झाली असावी. पण मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा मुलांच्या खेळण्यात काही त्रुटी आहे म्हणून ती खेळणी वापरू नका, दुकानात परत करा असे बरेचदा कानावर आले होते. त्यावेळी आश्चर्य वाटले होते. सदोष वस्तू परत घेणे, बदलून देणे अथवा मोबदला देणे अशी ही रिकॊल प्रक्रिय़ा असते. कायद्यानुसार अनेक वस्तूंना ती लागू होऊ शकते. बरेच वेळा कंपन्या यातून सहीसलामत सुटण्याचा मार्ग आधीच शोधून ठेवत असतात. पुढे काही काळानंतर रिकॊल प्रक्रीयेत आम्ही सहभागी झालो होतो... मी मुलीकरता वापरत असलेली कार सीट त्या कंपनीने रिकॊल केली होती. काही बरे वाईट झाले असते तर .. या विचाराने मी सुन्न झाले होते. एक दोन वर्षांनी बाहुल्यांचा एक सेट उत्पादकाने परत मागवला होता. त्या रंगात शिसे जास्त प्रमाणात आढळले होते. लहान मुले खेळणी चोखतात, जे शक्य असते ते खेळण चावतात, काही चक्क गिळून टाकतात त्यामुळे चांगल्या दुकानातून चांगल्या कंपनीची खेळणी घे हा सल्ला मला पटला होता. मी तो पाळत होते. पण अशा खेळण्याचाही रिकॊल होतो...अनेकदा रिकॊल केलेल्या वस्तू ’मेड इन चायना असतात’. पण अमेरिकन वस्तूंचा रिकॊल होत नाही असे नाही. फक्त जास्त गाजावाजा इतर देशातील उत्पादक असला की होतॊ. याचे उदाहरण म्हणजे टोयोटाची केस.

काही महिन्यांपुर्वी टोयोटा गाडीच्या पार्टचा , काही विशिष्ट गाड्यांचा रिकॊल गाजला होता. जपानमधून अमेरिकेत येऊन या कंपनीच्या सीइओने जाहीर माफी मागितली. त्याचा सगळीकडे गाजावाजा केला गेला. खर इतर कंपनीच्या गाड्यांचा पण नंबर लागला. पण त्यात इतर देशातले उत्पादक जास्त होते. डबघाईला आलेला ऒटॊसेक्टर, बुडीत जाणारी आर्थिक व्यवस्था आणि त्यावेळी परदेशी कंपन्यांचा वाढता शिरकाव याने अमेरिकन जनता ढवळली गेली नाही तरच नवल. किंबहुना आता इतरांचा नंबर लागेल याची खात्रीच होती. पण हे एवढ्यावरच थांबले नाही इतर कंपन्या ज्यात अमेरिकन उत्पादकही होते त्यांनासुद्धा फटका बसलाच.

एका औषधाच्या कंपनीचे औषध परत मागवले की लगेच तिच्या प्रतिस्पर्धी कंपनीचे दुसरे एखादे औषध सदोष कसे आढळते? त्याआधी का मग सर्व चांगले असते? अशा प्रकारात किती स्पर्धा, किती राजकारण किती तथ्य आहे ते नेहमीच समोर येत नाही.
मध्यंतरी भारतीय दुकानातले सर्व मसाले दुकानातून काढून टाकण्यात आले कारण त्यात अनेक दोष आढळले, आरोग्याला घातक घटकांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले. ( मला शंका आहे या दुकानदारांनी आपला माल तरीसुद्धा कुठेतरी किमान किमतीला खपवलाच असेल..)

घराघरातून वापरले जाणारे मोट्रीन हे (ब्रुफेन सारखे )एक लहान मुलांचे औषध कंपनीने परत मागवले आहे. त्याच फॆक्टरीत तयार होणारी अनेक औषधे लोक वापरतात. त्यापैकी काहींचा रिकॊल आहेच.
अशा बातम्या वाचल्या, ऐकल्या तर ठीक नाहीतर काय ? माहित नसतांना एखाद्यावर आपत्ती ओढवली आणि बातमी तुमच्यामुळेच तयार झाली तर काय?

नुसता रिकॊल करून हे सर्व संपते का? ज्यांच्या जिवाला हानी झाली ती भरून काढता येत नाहीच. आर्थिक नुकसान होतेच. पण उत्तम प्रतीची वस्तू, उत्कृष्ट प्रतीचा पुरवठा सातत्याने निर्माण होत नाही हा कळीचा मुद्दा आहे. साधारणपणे कला क्षेत्रात एखादा कलावंत सतत उत्तम प्रदर्शन करू शकत नाही तसे तर या पुरवठ्याचे नाही. उत्तम प्रतीचे उत्पादन व्हावे याकरता साचेबंद प्रक्रिया असते. ती आधीच ठरलेली असते, आजमावलेली असते. पण कच्चा माल, उत्पादन पद्धती,बांधणी या सर्वात कशी सूट घेतली जाते?
फायदा हवा असतो पण चटकन आणि कमी गुंतवणूक करून. ही लोभी वृत्ती कधी थांबणार? अशा वृत्तीचा कायमचा रिकॊल कोण करणार?

वस्तूंचा रिकॊल झाला म्हणून प्रश्न संपत नाहीत. पुन्हा असे काही निर्माण होणार नाही आणि जे चुकले आहे ते कसे सुधारता येईल याची हमी कोणाची? परमेश्वरालाही अशा वृत्तीची चुकीची, कमी गुणवत्तेची मॊडेल्स एकदा रिकॊल करता आली आणि नंतर कायमची बंद करता आली तर किती बर होईल!

Sunday, April 18, 2010

सर्व काही विसरलेले

सर्व काही विसरलेले
झंझावात हा सुरेश भटांचा संग्रह आहे का?>तेंडूलकरांच्या दहा नाटकांची नावे काय आहेत? लता मंगेशकरचे पहिले गाणे कोणते? सध्या कोण वर्ल्ड कप सॉकर चा विजेता आहे? अशा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मला आता आठवत नाही. पण या प्रश्नांची उत्तरे येणारी अनेक माणसे मला माहिती आहेत. या लेखकाने असे असे वाक्य या पुस्तकात या पानावर, या मुलाखतीत म्हटले असे संदर्भ देत नावानिशी कवितेच्या कथेच्या ओळीच्या ओळी धडाधड उद्धृत करत जाणार्‍या चालत्याबोलत्या माणसांबद्दल मला खूप आदर आहे. शिवाय त्यांची अशी माहिती एका लेखकाविषयी एका विषयासंबंधीच असते असे नाही शास्त्र, विनोद, चित्रकला, कविता, सिनेमा गाणि जगभरातले खेळ अशा नानाविध प्रांतात ते तेवढेच तरबेज असतात. अशा अनेक मित्रमैत्रिणी मला अहेत की ज्यांना मी माहितीकोश /संदर्भकोष म्हणते! कित्येकांचा हा स्वभाव असतो, अनेकांना ते प्रयत्नाने जमलेले असते.

वाचन असणे , माहिती असणे आणि नेमकी योग्य वेळी आठवणे आणि ती सांगणे ही एक कला आणि खासियत आहे असे मला वाटते. अनेकदा मला फार येत हे दाखवणे हा त्यामागचा हेतू असू शकतो ही एक शक्यत आहेच. पण त्याकडे आपण तूर्तास कानाडोळा करू या. वेगवेगळ्या वयोगटात असूनही काही व्यक्ती अनेक विषयांवर तेवढ्याच ताकदीने संदर्भासहीत बोलतांना दिसतात हे नाकारता येत नाही. न आठवण्याच / विसरण्याच माझ वय नाही किन्वा माझ्या काही लक्षातच राहत नाही असे नाही पण एक सिलेक्टिव्ह मेमरीच बटन मी नक्की केव्हापासून ऑन केले आहे माहिती नाही. त्यामुळे अनेक गोष्टींचा आस्वाद घेऊन, त्यांचे महत्त्व जाणले की मी पुढे जाते पण मला संदर्भ देता येत नाहीत. मला गाजलेल्या कविता , गाणी जशीच्या तशी इत्यादी आठवत नाहीत. मनात कायम राहिले आहे ते केवळ पाच ते बारा या कालावधित जे काही कळना न कळता निव्वळ घोकले तेचः) माझे दैनंदिन अनुभव असे गोष्टी विसरत असल्याचे असूनही सुदैवाने कोणत्याही रोगाची सुरुवात / चिन्हे माझ्या डॉक्टरला सापडलेले नाही. बाकी सर्व मला हे माह्ती पण .. अर्र... अशा थाटात घेत असते.

इतरांच्या नाहीच माझ्याही कवितेच्या ओळी मला आठवत नाहीत. कधी काळी एकदा वाचलेले अगदी जसेच्या तसे सांगता यायचे ते कसब कुठे गेले? कशामुळे आस्वाद घेऊन नंतर विसरण्याची वृत्ती जागी झाली? थिएरम्स, एक्वेशन्स , सगळ्यांना हा नियम लागू होतो. पण मग मी पत्ते फोन अथवा व्यक्तीच्या आवडीनिवडी कशा विसरत नाही?

हाताशी पुस्तक, गुगल असणे अशा विविध सोयींमुळे विसरले तरी चालते असे मनाला वाटते का? की अशा मोठमोठ्या याद्या देण्यात फार शहाणपणा नाही असे वाटते? योग्य वेळी मार्मिक संदर्भासहित बोलणे ही एक कला आहे. पण ती अनेकांना येत नाही तसेच माझे झाले आहे.
कुणीतरी नवे पाठांतर करून पाहिले किंवा सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याची सूचना मनाला दिली,जे वाचू ते कोणालातरी सांगितले तर फायदा होईल असे म्हटले आहे. तसा मी निश्चय केला आहे:) काही फरक पडतो का पाहू या.

लक्षात राहण्याकरता तुम्ही कोणते असे खास उपाय करता का? कोणाला माझ्यासारखाच अनुभव आहे का?

Thursday, March 18, 2010

आला ऋतू राज वसंत!

आला ऋतू राज वसंत!

थंडीचा कडाका कमी झाला आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशाने दिशा उजळल्या आहेत. जागोजागी पडलेला बर्फ आता वितळू लागला आहे. अनेक ठिकाणी दगडावर झरे वाहते झाले आहेत. जमिनीखाली दडलेले ट्युलिप, लिली आणि डॅफोडिल्स वर आली आहेत. झाडांना पालवी फुटलेली दिसते आहे, अनेक फांद्यांवर कळ्या खुलून दिसत आहेत. वसंत आला आहे, नाचत आणि हासत ...चराचराला चैतन्याची पालवी देऊन. एकाकी पडलेली जणू सन्यास घेतलेली झाडे आता परत जगण्याच्या इच्छेने जागी झाली आहेत ती याचीच किमया आहे.
लवकरच चेरी ब्लॉसम फेस्टीवल येईल. फुललेली झाडे सगळ्यांचे लक्ष वेधतील. धरती नटेल, सजेल आणि प्रीतीचा ऋतू येईल - ऋतू राज वसंत!
वसंताने भारलेली ही माझी एक कविता-

पाषाणावर झरा हासरा
मरगळ गेली झाडाची
दिशादिशांना फुटे पालवी
किमया हीच वसंताची

स्वच्छ कोवळे ऊन पाहुनी
सुचते पक्ष्यांना गाणे
श्वास सुखाचे घेवुन आले
फुलून फांदीवर लेणे

नको विरक्ती शिशिराची मज
नको एकट्याने जगणे
श्रॄंगाराने धरती सजली
करता स्पर्श वसंताने

Wednesday, March 17, 2010

कशासाठी ?पोटासाठी..!.निवड आणि परिणाम

कशासाठी? पोटासाठी. निवड आणि परिणाम..!
आई मला वरण भात खायचा नाही.. काय ते सारख इंडीयन फूड.. असा आमच्याकडे घडणारा रोजचा संवाद असतो.
इतर घरे सुद्धा अपवाद असतील असे नाही. पण जे आवडत ते इंडियन फूड चालत( पनीर, भेंडीची भाजी पुलाव, पुर्‍या, भजी, चिवडा लाडू, गाजर हलवा, शीरा आणि गुलाबजाब अशी यादी म्हणू).अमेरिकेत काही भागात भारतीय भाज्या मिळत नाहीत, मुळात दिसायला एकदम टवटवीत आणि बारा महिने मिळत असले तरी भाजी आणि फळांना चव नाही, त्यामुळे जास्तीत घराघरात जास्त मसालेदार जेवण करण्याकडे कल दिसतो. एवढ करूनही पदार्थ भारतात आपल्या घरात असतात तसे लागत नाहीतच. हा केवळ समज नसून यात तथ्य आहे. अमेरिकेत किंवा सर्वसाधारणपणे भारताबाहेर राहणारे सर्व भारतीय जास्तीत जास्त भारतीय आहार कसा कायम ठेवता येईल यासाठी प्रयत्न करत असतात पण ती चव कायम ठेवणे नेहमीच शक्य होत नाही. भारतीय हॉटेलात पदार्थांचा रंग पाहिला की पालक पनीर असे हिरवे दिसते की अंगावर येते, कोफता करी इतकी रंगीत दिसते की त्यात रंग मिसळला आहे हे कुणीही सांगेल. पण रंगात काय असते, ते किती चांगले याचा विचार करायला वेळ कुणाला आहे? बस्स भारतीय जेवण कमीत कमी कष्टात आणि किती सहज याकडे लक्ष असते. भारतातून किती लोणची, मसाले आणणार? दाण्याचे कूट, तिळाचे कूट, धना जिरा पावडर, गरम मसाला, गोडा मसाला सगळे किती आणायचे आणि किती स्वतः करायचे? पावभाजी मसाला, रस्सम मसाला याचे काय? शेवटी अगदी रोज नाही तरी समारंभांना पार्ट्यांना उघड पाकीट घाल मसाला, वापर तयार मिक्स अशी सवय होते.
रुपये आणि डॉलर चे समीकरण हळू हळू मागे पडते, नव्या चवीचा स्वीकार होतो आणि अमेरिकेत स्थाईक भारतीय आपले आयुष्य चवीने चाखू लागतात. उघड कॅन घाल छोले, उघड डबा खा रसगुल्ला .. शिवाय हे सर्व किती ताजे आणि किती चांगले आहे याचा भडिमार भारतीय टीव्ही करत असतोच.
भारतातून आलेली एखादी आजी म्हणते ही कणीक वेगळी आहे, हा मसाल फारच रंगीत आहे, याला जसा कृत्रिम वास आहे.. आपण कानाडोळा करतो, कधी कष्ट घ्यायचे नसतात तर कधी नाईलाज असतो तर कित्येकदा नव्याचा हव्यास! आणि तेच सगळे चांगले चा घोषा!

अनेक विद्यार्थी, एकटे राहणारे नोकरदार यांच्या करता भारतीय पाकीटबंद 'दो मिनिट खाना' म्हणजे उत्तम सोय आहे.
मग अचानक कुणाच्या तरी मेडिकल रिपोर्टमधे असे काही निघते त्याने किमान काही जणांचे डोळे उघडतात. या सर्वाचा फटका बसतो अनेकवेळा लहानग्यालाच! ताजे अन्न खा, आहार विहाराकडे लक्ष द्या हा नियम फक्त आजारी माणसाला आणि गर्भवती महिलांना लागू नसून सर्वांना आहे.भारतीय दुकानात मिळणारे अनेक तयार मसाले ,हळद, हिंग इत्यादीत लेड (शिसे) चे प्रमाण धोकादायक आढळले आहे. चायनीज हॉटेलात नो एम्एसजी अशा पाट्या असतात तशा 'नो लेड इन स्पायसेस' अशा पाट्या भारतीयांना लावाव्या लागतील.. तरी परिस्थिती किती सुधारेल आणि काय खरे काय खोटे हे तुम्हा आम्हाला माहिती आहे. अमेरिकन पदार्थातही अशी धोकादायक भेसळ होत असते , ती सापडते त्यावर उपाय शोधला जातो ही सर्वसाधारण पद्धत आहे. जपानी कार्स , चायनीज फूड, भारतीय मसाले आणि पर्यायाने माणसे हे सर्व अमेरिकेला नकोसे झाले आहे असे कुणी म्ह्टले तरी भारतात गुणवत्ता आणि नफातोटा याचे गणित कसे सोडवतात यावर दुमत नसावे!म्हणून 'वेक अप इंडियन्स' अजून वेळ गेली नाही असेच म्हणायला पाहिजे.

दोन करियर्स, मुले, भारताबाहेर राहून आवडीनिवडी, भारतीय वंशाचा जपणूक ही सर्व तारेवरची कसरत करतांना लक्षात फक्त एवढेच ठेवायचे आहे की आयुष्य एवढे सोपे नाही आणि सहज मिळते असे सुद्धा नाही. कसे जगायचे या प्रश्नाचे जे उत्तर असेल , तुम्ही जशी निवड कराल तसे फळ मिळेल. नशीबात जे असेल ते होईलच पण आपण कर्तव्य केले याचे समाधान मला जास्त महत्त्वाचे वाटते. आम्ही अमूक कपडे घालतो, आमचे घर असे आहे, आमच्याकडे या गाड्या आहेत, मुले अमेरिकेत कशी रूळली आहेत यापैकी कशाचे आणि किती गोडवे गायचे ती प्रत्येकाची निवड आहे. जे महाग आहे ते सर्व चांगले असे नाही. अनेकदा जास्त पैसा देण्यापेक्षा कष्ट करणे शहाणपणाचे ठरते. पण दोन उच्चशिक्षित माणसे घरात असतांना त्यांना योग्य निवड करता येत नसेल तर याहून दु:ख कोणते?
भारतात दिसते ते पाश्चिमात्यांचे अनुकरण आणि भारताबाहेर जिथे राहतो तिथे आपण सामावून घेतले जावे याची धडपड यामधे नेमकी नक्क्की निवड कशी करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण उत्तरावर अवलंबून आहे पुढच्या पिढीचे संगोपन आणि त्यांची जडणघडण!



Monday, March 8, 2010

तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे

तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे

तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे -ही ग्रेस यांची ओळ मला एका वेगळ्या संदर्भात आठवते.
पुण्यात रहायचो तिथे माझ्या मैत्रिणीचा भाऊ गच्चीवर अभ्यास करायचा. अभ्यास करायचा तर करू देत पण नेमका गाणी लावून अभ्यास करण्याची त्याला सवय होती. त्यामुळे हे साहेब अभ्यासाला बसले की ज्यांना गाणी लावून अभ्यास करता येतो तेवढ्यांनाच अभ्यास करता यायचा. एक दोनदा मैत्रिणीने आणि मी सुद्धा आवाज तरी थोडा कमी कर असे सांगून पाहिले. त्याचा परिणाम अगदी थोडा वेळ टिकायचा ..पुन्हा अभ्यास राहिला बाजूला आणि गाणी सुरु असे असायचे..सुदैवाने त्याच्या आणि माझ्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या होत्या,शिवाय परीक्षा तोंडावर आल्याशिवाय मला अभ्यास सुचायचाही नाही. उद्या सबमिशन की आदल्या रात्री जाग येणार्‍या इंजिनियंरींगचे आम्ही विद्यार्थी... एरवी जगात ज्या काही सुंदर गोष्टी असतात त्याच्यात लक्ष गुंतवायचे, काही नाही तर बोटक्लबवर बसून नदीचे पाणी पहायचे यात धन्यता मानायची एक सवय लागली होती. असो. पण त्यामुळे फार फरक पडायचा नाही. त्यामुळे गाण्याचा त्रास नव्ह्ता हे बरेच. आमचे शेजारी उत्तम शास्त्रीय संगीत गायचे. काका काकू , आजोबा सगळ्यांना संगिताची आवड होती. समज होती. हा मुलगा सुद्धा अपवाद नसावा. पण त्याचे जग वेगळे होते. त्यात तो एम सी एस की एक सीए काय करत होता तेही पुणे युनिवर्सिटीत... मग विचारायलाच नको. इंग्रजीचे भूत शिरले होते अंगात अमेरिकेत जायचे म्हणून तयारी सुरु असायची. सारखा एम टीव्ही आणि इंग्रजी गाणी..

.. अभ्यास प्रोग्रॅमिंग त्याला जमत असावे असे वाटायचे. कायम एक दोन मुली घरी आलेल्या दिसायच्या. एखादी दुसरी त्याच्याबरोबर (कॉलेजात बहुधा) जायची यायची... माझी मैत्रिण भावाची तारीफ करायची. त्याच्या बरोबर आलेल्या मुलींना चहा आणि खायला द्यायची. ( तिला भाऊ पॉकेटमनी देत असावा अशी शंका मला नेहमी यायची. )त्याकाळी मोटरसायकलवर कधीही एकही मुलगी बसलेली नसेल तर मुलाविषयी भलती शंका येत असण्याचा हा काळ होता. त्यात थोडी नवलाई शिल्लक होती. चौकात लाल दिवा असेल तरी आपले इलु इलु चाळे (सॉरी- प्रणयाराधन की काय म्हणतात की काय म्हणतात ते..) चालू असे प्रकार त्यामानाने कमी होते. यातल मी काही करणार नव्हते असे नव्ह्ते,म्हणून जळफळाट होता असे नाही पण योग्य वेळ आणि मुलगा सापडला नव्ह्ता इतकेच.
एक दिवस त्याचा आवाज वाढला होता,रागावारागवी होती आणि बरोबर एकही मुलगी नव्ह्ती.. नंतर कळल की त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली नव्हती म्हणून त्याची खास लाडकी मैत्रीण(जी आमच्याही ओळखीची झाली होती ती) सोडून- दुसर्‍याबरोबर गेली होती..
इंग्रजी म्युझिक काही काळ बंद झाल होत.. हुश्श..

त्याला एका चांगल्या कंपनीत कालांतराने नोकरी मिळाली होती. नोकरी चांगली असावी पण बरोबर एक चुणचुणीत छोकरी दिसत होती ..नेमाने ..एम टीव्ही सुरु होता पण तो ऐकायच्या त्या सिड्या बदलल्या असाव्या.. आवड बदलली होती का ते कळायला मार्ग नव्हता कारण आजकाल हेड्फोन असायचा त्याच्याजवळ! त्याने आम्हाला गाणी कळत नव्ह्ती ही बोंब होती:) नंतर कळल की ती मुलगी साउथ इंडियन होती आणि त्याला कर्नाटकी / दाक्षिणात्य शास्त्रीय संगीत आवडायला लागले आहे..न आवडून चालल नसतच म्हणा:) जोडीदारासाठी तडजोड करावी लागते, आवडी बदलाव्या लागतात पण प्रत्येक गोष्ट वेगळी असेल तर किती आवडीनिवड बदलणार आणि किती बदलणार? ज्यांना जमत , किंवा तस न करता राहता येत तेच असा प्रेम विवाह करत असावेत. सगळा बॅक्ग्राउंड नॉईज जो आजवर मी ऐकून ऐकू येत नाही असे करायला लागले होते तो अचानक बंद झाला होता. तरी माझा अभ्यास झाला, परीक्षा झाल्या.. डिग्री मिळाली नोकरी लागली.त्या मुलाची त्याच मुलीशी एंगेजमेंट आणि लग्न झाल ,त्यांच विमान अमेरिकेत उतरल...

मला मात्र सहाएक महिन्यात अमेरिकेला जायच अस मनात नसतांना तिथलीच स्थळ येऊ लागली आणि पोटात धस्स व्हायला लागल.सुदैवाने मला लग्नानंतर आवडीनिवडी बदलाव्या लागल्या नाहीत ना नवर्‍याला. मला संगिताचे जेवढ ज्ञान आहे तेवढच त्याला मराठी कवितांच.. त्यामुळे एकमेकांबदल कौतुक आणि आदराने आमचा संसार सुरळीत चालतो. अधून मधून दोघांच्या आवडत्या पिठल्याला खमंग फोडणी दिल्यासारखी भांड्णे होतात ती आवश्यकच असतात असे मी म्हणते,
कधीतरी प्रेम स्थिर झाल्यावर पुन्हा आपल्या सवयी आवडीनिवडी डोक वर काढत असतीलच. तेव्हा काय करायचे? हे विचार लग्नाआधी तर यायचे आणि अजूनही अशा वेळी काय करत असतील प्रेमविवाह करणारे लोक असे विचार मनात येतात.
अशी अनेक जोडपी मी पाहिली आहेत ज्यांच्या आवडीनिवडी भाषा संस्कृती सगळे वेगळे आहे. मुलांनी काय करायचे याची निवड कशी करायची ही एक गंमतच असते. पण संसार त्यावाचून अडत नसावेत. अशा बाबतीत ते समांतर चालत असावेत का? की कुठेतरी काहीतरी कमी असा अर्धा चंद्र त्यांना दिसत असेल? 'तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे असे होत नाही':)

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits